२३ जानेवारी बाळासाहेब केशव ठाकरे यांची जयंती.

वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन.

बाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे (जानेवारी २३, १९२६; पुणे - नोव्हेंबर १७, २०१२; मुंबई) हे महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापक, राजकारणी व व्यंगचित्रकार होते. ते हिंदुत्ववादी, दक्षिणपंथी नेता, व मराठी लोकांचे समर्थक होते. 'सामना' या मराठी दैनिकाचे हे संस्थापक, तसेच प्रमुख संपादकही होते. त्यांचे कार्य प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यात होते.

    बाळासाहेबांनी सर्वप्रथम एक व्यंगचित्रकार म्हणून सामाजिक प्रश्नांवर भाष्य करण्यास सुरुवात केली. इ. स. १९५० मध्ये ते 'फ्री प्रेस जर्नल’ मध्ये व्यंगचित्रकार म्हणून रुजू झाले. पुढील काळात त्यांनी ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्यासमवेतही काही काळ काम केले. फ्री प्रेस जर्नलमध्ये काम करीत असतानाच बाळासाहेब ठाकरे विविध संस्थांसाठी, कंपन्यांसाठी व नियतकालिकांसाठी चित्रे, व्यंगचित्रे, जाहिरातीचे डिझाइन या क्षेत्रांतही काम करीत असत. त्यांच्या व्यंगचित्रात इंदिरा गांधींची व्यक्तिरेखा आवडती होती.

    बाळासाहेबांनी नोकरी सोडून स्वतःचे साप्ताहिक (व्यंगचित्रात्मक) काढण्याचा निर्णय घेतला. या निर्णया नुसार त्यांनी ऑगस्ट, इ.स. १९६० मध्ये ‘मार्मिक’ हे साप्ताहिक सुरू केले. साप्ताहिकासाठीचे हे ‘मार्मिक’ नाव बाळासाहेबांना वडील प्रबोधनकारांनी सुचविले होते. मराठीतील हे पहिले व्यंगचित्र साप्ताहिक ठरले. ‘मार्मिक’च्या पहिल्या अंकाचे प्रकाशन तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. या समारंभास प्रा. अनंत काणेकरही उपस्थित होते. संयुक्त महाराष्ट्र स्थापन झालेला होता, पण प्रामुख्याने मुंबईत मराठी माणसावर अन्याय होतच होता. या प्रश्नाला मार्मिकने वाचा फोडली. महाराष्ट्रात येऊन मराठी माणसा बद्दल अनादर बाळगणाऱ्यांना बाळासाहेब ठाकरेंनी व्यंगचित्रांच्या माध्यमातून टीका केली. इ. स. १९६० पासून ते राष्ट्रीय व महाराष्ट्र राज्य स्तरावरील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत, तसेच इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर मराठी जनांना मार्गदर्शन करत ‘मार्मिक’ अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे. बाळासाहेब ठाकरे लहान मुलांसाठीच्या "श्‍याम" या पाक्षिकाचे सुद्धा संपादक होते.

    बाळासाहेब ठाकरेंनी जून १९, इ. स. १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना केली. बाळासाहेब ठाकरेंच्या मते, 'समाज सुधारकांची समृद्ध परंपरा असलेला महाराष्ट्र पुरोगामी आहे, पण मराठी माणूस मागेच राहिला आहे. महाराष्ट्रात सुविधा आहेत, पण मराठी माणूस दुविधेत आहे. महाराष्ट्रात उद्योग आहेत, पण मराठी तरुण बेरोजगार; तर महाराष्ट्रात पैसा आहे पण मराठी माणूस गरीब आहे. महाराष्ट्राला भारतात मान आहे पण मराठी माणूस महाराष्ट्रातच (प्रामुख्याने मुंबईत) अपमानित होतो आहे.' शिवसेनेचा पहिला मेळावा ऑक्टोबर ३०, इ.स. १९६६ रोजी शिवतीर्थ मैदानावर संपन्न झाला. ज्यात सुमारे ५ लाख लोकांचा सहभाग होता. या मेळाव्या पासूनच बाळ ठाकरे आणि शिवतीर्था वरील (शिवाजी पार्कवरील) मराठी माणसांची गर्दी यांच्या मध्ये नाते संबंध प्रस्थापित होण्यास सुरुवात झाली.

    वक्तृत्वा बरोबरच बाळासाहेब ठाकरे भेदक लेखन देखील करत. बाळासाहेबांचे वडील प्रबोधनकार ठाकरे व प्रल्हाद केशव अत्रे यांचा प्रभाव त्यांच्या लेखनात जाणवतो. शिवाय व्यंगचित्रकाराची वेधक - वेचक निरीक्षण दृष्टीही त्यांच्यामध्ये होती. ‘सामना’ हे केवळ शिवसेनेचे मुखपत्र आहे, ज्यात संपादक म्हणून बाळासाहेब ठाकरे यांचे अग्रलेख असे.

    झुणका भाकर केंद्रांची योजना, वृद्धाश्रमांची साखळी, वृद्धांना सवलती, झोपडपट्टी वासीयांना घरे, मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग, मुंबईतील उड्डाणपूल, बाँबेचे मुंबई नामकरण अशा अनेक योजना-प्रकल्पांची मूळ संकल्पना ही बाळासाहेब ठाकरेंची होती. व्हॅलेंटाईन डे सारख्या पाश्चिमात्य उत्सवांना विरोध, परप्रांतीयांच्या तसेच बांगला देशींच्या विरोधातील आंदोलने यांमागचा विचारही त्यांचा होता.

    बाळासाहेब ठाकरे हिंदुत्ववादी होते. बाँबस्फोट, देशविघातक कृत्ये घडवणाऱ्या धर्मांधांना या देशात राहण्याचा अधिकार नाही. मतपेटीचे राजकारण करत अशा मुस्लिमांचे लांगुलचालन कोणी करू नये. भारताला आपला देश मानणाऱ्या राष्ट्रवादी मुस्लिम लोकांना आपला कोणत्याही प्रकारचा विरोध नाही - असे विचार त्यांनी मांडले. हिंदुत्ववादी भूमिकेमुळे त्यांना शिवसैनिकांनी "हिंदुहृदयसम्राट" म्हणले. 'गर्व से कहो हम हिंदू है' ही घोषणाही बाळासाहेब ठाकरेंच्या राजकारणाचा महत्त्वाचा भाग होती.

१७ नोव्हेंबर २०१२ रोजी मुंबईत मातोश्री या निवासस्थानी बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले.

    बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ठाकरे नावाचा चित्रपट हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांत २५ जानेवारी २०१९ रोजी प्रदर्शित झाला. याची निर्मिती संजय राऊत यांनी केली होती, तर नवाजुद्दीन सिद्दिकी हे बाळासाहेब ठाकरेंची भूमिकेत होते.
 "वसुधैव कुटुम्बकम्"
दररोज आपण आपल्या जीवनात रात्रंदिवस होणाऱ्या बदलाचे किंवा घडामोडींचे साक्षीदार असतो. परंतु आपल्या वसुंधरेवर कधी व कुठे काय घडले अश्याच अधिक माहिती जाणून घेण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करा. 

=> दैनंदिन दिन विशेष.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!