काय आहे रथसप्तमीचा इतिहास आणि महत्त्व, जाणून घ्या.

भारतीय संस्कृती सर्वांप्रति कृतज्ञता व्यक्‍त करण्यास शिकवते. 

    
त्या अनुषंगाने सूर्यदेवते प्रति कृतज्ञता व्यक्‍त करण्यासाठी रथसप्‍तमी हा सण साजरा केला जातो. हिंदु धर्म आणि भारतीय संस्कृती यांमध्ये उच्च देवतांची उपासना आणि त्यांचे विविध सण अन् उत्सव आहेत. त्याच प्रमाणे त्यांत कनिष्ठ देवतांचीही उपासना आहे. सूर्य, चंद्र, अग्नि, पवन, वरुण आणि इंद्र या प्रमुख कनिष्ठ देवता आहेत. मानवाच्या जीवनात तसेच सर्वच प्राणिमात्रांच्या जीवनात या कनिष्ठ देवतांना महत्त्वाचे स्थान आहे.

    माघ मासातील (महिन्यातील) शुक्ल सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते. या दिवसापासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतो. या रथाला सात घोडे असतात; म्हणून रथसप्तमी असा शब्द वापरला जातो. ज्या सूर्यामुळे अंधार नाहीसा होतो आणि चराचराला नवे तेज, नवे जीवन लाभते, त्या भास्कराची ही पूजा आहे. ही प्रकाशाची, सूर्यदेवतेची पूजा आहे. रथसप्तमी हा स्त्रिया संक्रांतीनिमित्त करत असलेल्या हळदी-कुंकवाचा शेवटचा दिवस मानला जातो.

रथसप्तमी हा सूर्यदेवाचा जन्मदिन !

    ‘माघ शुक्ल पक्ष सप्तमीला रथसप्तमी असे म्हणतात. महर्षि कश्यप आणि देवमाता अदिती यांच्या पोटी सूर्यदेवाचा जन्म झाला, तो हा दिवस ! भगवान श्रीविष्णूचे एक रूप म्हणजेच श्री सूर्यनारायण होत. संपूर्ण विश्‍वाला आपल्या महातेजस्वी स्वरूपाने प्रकाशमय करणार्‍या सूर्यदेवांमुळे पृथ्वीवर जीवन अस्तित्वात आहे.

रथसप्तमी सणाचे महत्त्व:

    सर्व संख्यां मध्ये `सात’ या अंकाचे महत्त्व विशेष आहे. `सात’ या आकड्यात त्रिगुणांचे समतोल प्रमाण असण्या बरोबर सत्त्व गुणाच्या वृद्धीसाठी आवश्यक चैतन्य, आनंद इत्यादि सूक्ष्म-लहरी ग्रहण करण्याची विशेष क्षमता असते. सप्‍तमी या तिथीला शक्‍ति अन् चैतन्य यांचा सुरेख संगम झालेला असतो. या दिवशी विशिष्ट देवतेचे तत्त्व आणि शक्‍ति, आनंद आणि शांति यांच्या लहरी २० टक्के जास्त प्रमाणात कार्यरत असतात. रथ सप्‍तमीच्या दिवशी निर्गुण सूर्याच्या (अतिसूक्ष्म सूर्यतत्त्वाच्या) लहरी इतर दिवसांच्या तुलनेत ३० टक्के जास्त प्रमाणात कार्यरत असतात.

सूर्याचे उत्तरायणात मार्गक्रमण होत असल्याचे सूचक असलेला रथसप्तमीचा सण !

    रथसप्तमी हा सण सूर्य उत्तरायणात मार्गक्रमण करत असल्याचे सूचक आहे. उत्तरायण म्हणजे उत्तर दिशेकडून मार्गक्रमण करणे. उत्तरायणात सूर्य उत्तर दिशेकडे कललेला असतो. ‘श्री सूर्यनारायण आपला रथ उत्तर गोलार्धात वळवत आहेत’, अशा स्थितीत रथसप्तमी दर्शवली जाते. रथसप्तमी हा सण शेतकर्‍यांसाठी सुगीचे दिवस आल्याचा आणि दक्षिण भारतात हळूहळू वाढणार्‍या तापमानाचा दर्शक असतो, तसेच वसंत ऋतू समीप आल्याचा सूचक असतो.

कठीण दिवसांसाठी सिद्धता करण्याची आठवण करून देणारा सण !

    रथसप्तमीच्या दिवशी अंगणातील तुळशीकडे एका मातीच्या चुलीवर मातीच्या भांड्यात खीर शिजवली जाते आणि ती उतू जाईपर्यंत शिजवतात. त्यात ती खीर जळतेही. अशी चुलीवर जळलेली खीर प्रसाद रूपात खायचा आनंद काही वेगळाच असतो. वर्षाचे सर्व दिवस काही सारखेच आनंद देणारे असत नाहीत. काही दिवस जळके अन्न खाऊनही काढावे लागले, तर त्याची सिद्धता हवी. याची आठवण करून देणारा हा सण !

सूर्योपासनेचे महत्त्व:

    सूर्याच्या उपासनेने जिवाला स्वत:मधील सूक्ष्म-तेजतत्त्व वाढवण्याची संधी असते. यासाठी जिवाने तेजतत्त्वाच्या `ॐ’ काराची उपासना करणे उपयुक्‍त ठरते. त्याच प्रमाणे गायत्री मंत्र आणि सूर्याचे विविध मंत्र यांचे पुरश्चरण करणे फलदायी ठरते. सूर्योपासनेने जिवाच्या मनाची एकाग्रता वाढते. नेत्र हे तेजतत्त्वाशी निगडीत असल्याने सूर्योपासनेने (तेजतत्त्वाच्या उपासनेमुळे ) जिवाला दिव्यदृष्टि प्राप्‍त होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!